आषाढी यात्रा सोहळ्यासाठी प्रशासनाचे कालबध्द नियोजन

नदीपात्रात धोकादायक असणाऱ्या ठिकाणी फलक लावावेत

आषाढी यात्रा सोहळ्यासाठी प्रशासनाचे कालबध्द नियोजन

आषाढी यात्रा सोहळ्यासाठी प्रशासनाचे कालबध्द नियोजन

अप्पर जिल्हाधिकारी मोनिकासिंग ठाकूर

पंढरपूर, दि. 20: -आषाढी शुद्ध एकादशी सोहळा 17 जुलै 2024 रोजी होणार असून, या यात्रेसाठी पायी पालखी सोहळ्यासोबत मोठ्या प्रमाणात वारकरी भाविक येतात. पालखी सोहळ्यासोबत येणा-या वारकरी भाविकांना पालखी मार्गावर व तळांवर कोणतीही अडचण येऊ नये तसेच वारी कालावधीत येणाऱ्या भाविकांना चांगल्या दर्जाच्या सेवा सुविधा पुरवल्या जातील यासाठी प्रत्येक प्रशासकीय विभागाचे कालबद्ध नियोजन तयार करण्यात आले आहे. या नियोजनानुसारच कालमर्यादेत सर्व विभागांनी समन्वय राखून काम करावे अशा सूचना अप्पर जिल्हाधिकारी मोनिकासिंग ठाकूर यांनी दिल्या .आषाढी वारी पूर्व नियोजनाबाबत श्री विठ्ठल रुक्मिणी भक्त निवास पंढरपूर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बैठकीस प्रांताधिकारी सचिन इतापे, अमित माळी, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले, तहसीलदार सचिन लंगुटे, मदन जाधव, मुख्याधिकारी प्रशांत जाधव, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एकनाथ बोधले, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक महेश सुडके, नायब तहसीलदार मनोज श्रोत्री, चंद्रकांत हेडगिरे, मंदीर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.यावेळी अप्पर जिल्हाधिकारी मोनिकासिंग ठाकूर म्हणाल्या, आषाढी यात्रा सोहळ्यासाठी येणाऱ्या सर्वच पालखी मार्गावर व तळांवर आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करावाव्यात. पालखी मार्गावर व तळांवर तात्पुरत्या शौचालयाच्या ठिकाणी मुबलक पाण्याची उपलब्धता, जादाचे स्वच्छता कर्मचारी त्याचबरोबर सेक्शन मशीन ठेवावी. शौचालये वेळोवेळी स्वच्छ राहील याची दक्षता घ्यावी. आपत्कालीन मदत व प्रतिसाद केंद्रातील नियुक्त अधिकारी यांनी ज्या ठिकाणी नेमून दिले आहेत तेथील परिसराची पाहणी करून नैसर्गिक आपत्तीच्या दृष्टीकोनातून काही बदल करावयाच्या आवश्यक असल्यास तात्काळ करून घ्यावेत महावितरणने शहरातील रोहित्र, फ्युज पेटी यांना संरक्षक पॅनेल टाकावे. सार्वजनिक बांधकाम विभागाने शहरात येणाऱ्या त्यांच्या आखातरित्या असणाऱ्या रस्त्यांची पाहणी करून आवश्यक ठिकाणी तात्काळ दुरुस्ती करावी. राज्य परिवहन महामंडळाकडून पालखी सोहळ्यासाठी चंद्रभागा, भीमा,विठ्ठल व पांडुरंग या ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या तात्पुरत्या बस स्थानकात मोठ्या प्रमाणात वारकरी भाविक असतात त्या ठिकाणी आरोग्य विषयक सुविधा तात्काळ मिळाव्यात यासाठी आरोग्य सुविधा केंद्र तसेच रुग्णवाहिका यासह मुबलक पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्याची व्यवस्था करावी. आषाढी यात्रा कालावधीत चंद्रभागा नदीपात्रात पवित्र स्नानासाठी मोठ्या प्रमाणात भाविक जात असतात नदी पात्रात भाविकांच्या सुरक्षेसाठी जीवरक्षक,यांत्रिक बोटी, प्रशिक्षित पोहणारे, यांची उपलब्धता ठेवावी तसेच नदीपात्रात धोकादायक असणाऱ्या ठिकाणी फलक लावावेत अशा सूचनाही अप्पर जिल्हाधिकारी मोनिकासिंग ठाकूर यांनी यावेळी दिल्या.   यावेळी मुख्याधिकारी प्रशांत जाधव म्हणाले, मंदिर परिसर, प्रदक्षिणामार्ग स्टेशन रोड यासह शहरातील व अतिक्रमणे काढणे तसेच वाखरी पालखी तळावरील मुरमीकरण, झाडेझुडपे, सुलभ शौचालयांची दुरुस्ती आदीकामे 30 जून पर्यंत करण्यात येतील. शहरात व पालखी सोहळ्याबरोबर येणाऱ्या भाविकांना मुबलक प्रमाणात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा व वेळोवेळी औषध फवारणी व स्वच्छता करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले