पंढरपूर नगरपरिषदेची कार्तिकी यात्रा 2022 साठी यंत्रणा सज्ज.

वारक-यांना सेवा सुविधा पुरविण्याकामी पंढरपूर नगरपरिषदेची यंत्रणा सज्ज झालेली आहे. 

पंढरपूर नगरपरिषदेची कार्तिकी यात्रा 2022 साठी यंत्रणा सज्ज.

पंढरपूर नगरपरिषदेची कार्तिकी यात्रा 2022 साठी यंत्रणा सज्ज

 अवघ्या महाराष्ट्राची आध्यात्मिक राजधानी असलेल्या श्री.क्षेत्र पंढरपूर येथे दि.04/11/2022 रोजी कार्तिकी यात्रा भरत असुन येणा-या लाखो भाविक वारक-यांना सेवा सुविधा पुरविण्याकामी पंढरपूर नगरपरिषदेची यंत्रणा सज्ज झालेली आहे. 

यात्रेकरुंना यात्रा कालावधीमध्ये खालीलप्रमाणे सुविधा देण्यात येणार आहेत. नगरपरिषदेने प्रदक्षिणा रस्त्याचे डांबरीकरण केले आहे. शहरातील इतर रस्ता दुरुस्तीची कामे यापुर्वी करण्यात आली आहेत. तसेच अर्बन बँक ते नाथ चौक, सावरकर पुतळा ते महाद्वार, मंदिर परिसर, प्रदक्षिणा मार्ग, अंबाबाई पटांगण, चंद्रभागा वाळवंट येथील अतिक्रमण काढण्यासाठी विशेष मोहिम हाती घेण्यात आली असुन पोलीस प्रशासनाच्या मदतीने अतिक्रमण काढण्याचे काम चालु आहे. तसेच वाळवंटात येणा-या यात्रेकरुंना वाहनांची वाहतुकीची सोय व्हावी म्हणुन जुना पुल ते पुंडलिक मंदीर व या मुख्य रस्त्याला लागुन नदीपर्यंत उपरस्त्याची आखणी करण्यात आली आहे. तसेच पुंडलिक मंदीर ते दगडी पुलापर्यंत 9 हायमास्ट दिवे, प्रत्येक घाटासमोर असलेल्या लोखंडी पोलवर 200 वॅट एलईडी दिवे लावण्यात आले असुन सदर दिव्यांचा प्रकाश संपुर्ण वाळवंटात पडणार आहे. त्याचप्रमाणे यात्रेकरुंच्या सोईसाठी संपुर्ण दर्शन बारी मार्ग, 65 एकर मध्ये 160 एलईडी दिवे व 6 हायमास्ट बसविण्यात आले आहेत. तसेच 65 एकर मध्ये असलेल्या 1800 शौचालयामध्ये विजेची व्यवस्था करण्यात आलेली आहे. अनिल नगर येथील पाण्याच्या टाकीवरुन स्वतंत्र पाईप लाईन द्वारे यात्रेकरुंना पिण्याचे पाणी मिळावे या हेतुन नदीच्या वाळवंटामध्ये 45 नळ बसविण्यात आले आहेत. तसेच वाळवंटात विशेष स्वच्छता मोहिम राबविण्यात आली असुन यात्रेपुर्वी संपुर्ण वाळवंट दोनवेळा स्वच्छ करणेत आले आहे. तसेच उघड्यावर शौचास बसु नये म्हणुन विशेष टीम नेमण्यात आली आहे. तसेच नदी पात्र, पत्राशेड दर्शनबारी, 65 एकर, मंदिर परिसरात व शहरात आगीची दुर्घटना होवु नये म्हणुन 24 तास अग्निशमन वाहन उभे करण्यात आले आहे. पत्रा शेड, नविन अग्निशमन केंद्र, चंद्रभागा नदी वाळवंट तसेच मंदीरा भोवती आग लागल्यास अग्निशमन वाहनास त्वरीत पाणी उपलब्ध व्हावे म्हणुन मंदीराच्या दक्षिण बाजुस फायर हायड्रेट उभा केला आहे. भाविकांसाठी यात्रा कालावधीमध्ये मंदीर परिसरात दोन वेळा पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. गोपाळपुर रोड दर्शन बारी पत्रा शेडमध्ये पिण्याचे पाणी नळ कनेक्शन द्वारे उपलब्ध करुन दिले आहे. या ठिकाणी आतील बाजुस शौचालयाची व्यवस्था करण्यात आली आहे. शहरात एकुण 65 हातपंप व मंदिर परिसरातील विद्युत पंपाद्वारे यात्रेकरुंना पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे. तसेच यात्रा कालावधीत पिण्याचे पाणी किमान 10 टँकर द्वारे संपुर्ण शहरात विशेष: ज्या ठिकाणी मठांची संख्या जास्त आहे त्याठिकाणी पाणी पुरविण्यात येणार आहे. यात्रा कालावधीत पुर्वी शहरामध्ये विशेष स्वच्छता मोहिम राबविण्यात आली असुन यात्रा कालावधीमध्ये शहरात स्वच्छता रहावी म्हणुन नियोजन बद्ध कार्यक्रम आखण्यात आला आहे. नगरपरिषदेच्यावतीने 1400 सफाई कर्मचा-यांद्वारे व उपनगरात स्वच्छता करण्यात आली आहे. तसेच यात्रा कालावधीमध्ये शहर, वाळवंट, 65 एकर प्रत्येक मोठ्या मठांमध्ये स्वतंत्ररित्या कचरा साठविण्यासाठी लोखंडी बॅरेल ठेवण्यात यावे अशी सुचना मठाधीपतींना देण्यात आलेली आहे. तसेच 41 घंटागाडी द्वारेही कचरा गोळा करण्याचे काम यात्रा कालावधीत अहोरात्र चालु राहणार आहे. शहरामध्ये कचरा त्वरीत उचलण्यासाठी आरोग्य विभागाकडील 4 टिपर, 2 कॉम्पॅक्टर, 1 डंपरप्लेसर, 4 डंपिंग ट्रॉलिने व जेसीबीच्या सहाय्याने दररोज 100 ते 120 टन कचरा उचलण्यात येणार आहे. नदीपात्र व शहरातील विविध ठिकाणी पुरुष व महिलांसाठी प्रसाधनगृहे उभारण्यात आली आहेत. 

बायोकल्चर तंत्राचा वापर करुन जैविक पद्धतीने नदीच्या पात्रात होणारी घाण दुर्गंधीयुक्त वास कचरा व घाण कुजविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल राखला जाणार आहे. शौचालय नियोजनामध्ये तिर्थक्षेत्र विकास आराखड्याअंतर्गत व सुलभ शौचालयाची 29 ठिकाणी 2054 सीट्स, नगरपरिषदेची कायमची 25 ठिकाणी 176 सीट्स, 65 एकर परिसरातील कायम स्वरुपी 12 ठिकाणी 1864 सीट्स, प्री फॅब्रिकेटेड (नदी वाळवंट, 65 एकर, पत्राशेड दर्शनबारी, शहरात विविध ठिकाणी) असे एकुण 17 ठिकाणी 500 सीट्स असे शौचालयाचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच यात्रा कालावधीत मोकाट जनावरे पकडुन त्यांना शहराबाहेर सोडण्यात आले आहे.  

तसेच शहरातील न.पा.चे बोअर मठातील विहीरी, आडामध्ये मदर सोल्युशन टाकण्यात आले आहे. शहरात यात्रा कालावधीमध्ये उपजिल्हा रुग्णालयाच्यावतीने पत्राशेड दर्शनबारी, पोलीस संकुल, दर्शन मंडप, 65 एकर, चंद्रभागा वाळवंट, वेदांत भक्त निवास, नागरी आरोग्य केंद्र, महाद्वार पोलीस चौकी या 8 ठिकाणी यात्रेकरुंच्या सोईसाठी प्रथमोपचार केंद्र उघडण्यात आले आहेत. तसेच यात्रा कालाधीत कॉलरा हॉस्पिटल येथे 50 कॉटचे हंगामी स्वरुपाचे रुग्णालय स्थापित करण्यात आले आहे. तसेच यात्रा कालाधीमध्ये संपुर्ण यात्रेवर नियंत्रण ठेवण्यासाठी 65 एकर, नदी वाळवंट, गोपाळपुर रोड दर्शन बारी पत्रा शेड, पंढरपूर नगरपरिषद मुख्य कार्यालय, तुकाराम भवन अशा 5 ठिकाणी आपातकालिन व्यवस्थापन केंद्राची (EOC) स्थापना केलेली आहे. यात्रा व्यवस्थित पार पडावी म्हणुन पंढरपूर नगरपरिषदेचे प्रशासक तथा उपविभागीय अधिकारी गजानन गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली, मुख्याधिकारी अरविंद माळी, उपमुख्याधिकारी सुनिल वाळुजकर, नगरअभियंता नेताजी पवार, आरोग्य अधिकारी शरद वाघमारे, आरोग्य निरीक्षक नागनाथ तोडकर, पाणीपुरवठा अभियंता आत्माराम जाधव, विद्युत अभियंता राजकुमार सपाटे, रोडलाईट इन्स्पेक्टर संतोष क्षिरसागर, अग्निशमन अधिकारी बाळासाहेब कांबळे, सर्व विभाग प्रमुख व कर्मचारी प्रयत्नशील आहेत. तसेच यात्रा कालावधीमध्ये शहरातील सर्व स्थानिक नागरीकांनी स्वच्छता व आरोग्य सुव्यवस्थीत राहण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन मुख्याधिकारी अरविंद माळी यांनी केले आहे.