म्हैसाळ योजनेच्या पाण्याचा मंगळवेढेकरांचा हिस्सा पूर्ण क्षमतेने द्या - आ आवताडे 

मंगळवेढा तालुक्याला पाणी देताना दुजाभाव होत असल्याचे समितीच्या निदर्शनास

म्हैसाळ योजनेच्या पाण्याचा मंगळवेढेकरांचा हिस्सा पूर्ण क्षमतेने द्या - आ आवताडे 

म्हैसाळ योजनेच्या पाण्याचा मंगळवेढेकरांचा हिस्सा पूर्ण क्षमतेने द्या - आ आवताडे 

म्हैसाळ उपसा सिंचन योजनेअंतर्गत मंगळवेढा तालुक्यातील रेवेवाडी, हुन्नूर, लोणार, महमदाबाद, पडोळकरवाडी, शिरनांदगी, मारोळी, चिक्कलगी, जंगलगी, सलगर बु, सलगर खु, बावची, पौट, आसबेवाडी, लवंगी, शिवणगी, येळगी, सोड्डी, हुलजंती या १९ गावांना १२७० एमसीएफटी एवढे पाणी मंजूर असताना केवळ ८० एमसीएफटी म्हणजेच फक्त ६ टक्के पाणी या गावांना आजपर्यंत देण्यात आले आहे. या योजनेतील पूर्ण पाण्याची मागणी केली असता केवळ वेळोवेळी विविध तांत्रिक कारणांचा आधार घेऊन पाणीवाटपाचा हा कोणता न्याय करण्यात येत आहे ? असा खडा सवाल आ आवताडे यांनी कृष्णा कोयना उपसा सिंचन प्रकल्पाअंतर्गत म्हैसाळ उपसा सिंचन कालवा सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये उपस्थित केला.कृष्णा कोयना उपसा सिंचन प्रकल्पाअंतर्गत म्हैसाळ उपसा सिंचन कालवा सल्लागार समितीची बैठक व सन २०२३-२४ मधील रब्बी व उन्हाळी हंगामातील म्हैसाळ उपसा सिंचन पाणी नियोजन संदर्भात राज्याचे कामगारमंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री ना.सुरेश खाडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समिती सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय, सांगली येथे पार पडली यावेळी आ आवताडे यांनी मंगळवेढा तालुक्याला पाणी देताना दुजाभाव होत असल्याचे समितीच्या निदर्शनास आणले.

या बैठकीत बोलताना आ आवताडे म्हणाले की म्हैसाळ उपसा सिंचन पाणी योजनेअंतर्गत मंगळवेढा तालुक्यासाठी सांगली जिल्हा जलसंपदा विभाग अंतर्गत म्हैसाळ कालवे उपविभाग वितरिका क्रमांक -२ अन्वये 

तरतूद असणारे पाणी पूर्णदाबाने देण्यात यावे त्याचबरोबर वरील भागांना या योजनेतून ज्या पद्धतीने पाणी मिळते त्याच पद्धतीने पाण्याचे वाटप मंगळवेढा तालुक्यातील जनतेसाठी होणे अपेक्षित असताना पाणी वाटपाचा दुजाभाव केला जाऊ नये असेही त्यांनी सांगितले. नैसर्गिक दृष्टया दुष्काळी तालुका अशी पारंपरिक ओळख असणाऱ्या मंगळवेढा तालुक्याला निसर्गाने नाकारले आहे त्यामुळे आपण संवेदनशील भावनेने आमच्या पाणी प्रश्नाचा विचार करून आम्हाला पूर्ण क्षमतेने पाणी देण्यात यावे असेही आमदार आवताडे यांनी यावेळी म्हटले आहे.त्याचबरोबर म्हैसाळ उपसा सिंचन पाणी योजनेतून येत्या १७ नोव्हेंबर ते १० डिसेंबर या कालावधीमध्ये पाण्याचे आवर्तन सोडण्यात येणार असून यादरम्यान मंगळवेढा तालुक्याला पाणीपुरवठा करत असताना वरच्या भागाला पूर्णपणे लोडशेडींग करुन पूर्ण दाबाने मंगळवेढा तालुक्यासाठी पाणी देण्याची मागणीही आ आवताडे यांनी केली आहे. तसेच पाणीवाटप संदर्भात टेल टू हेड ही संकल्पना केवळ कागदावर न ठेवता त्याची अंमलबजावणी करून त्या पद्धतीने पाण्याचे वाटप करावे. टंचाई परिस्थितीतून या भागातील गावांना पाण्याचे वाटप करण्याचा ठराव कालवा सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये करुन तसा प्रस्ताव तयार करण्याचे सांगली व सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांना सूचित करावे असेही आ आवताडे यांनी मागणी करताना सांगितले आहे. आ आवताडे यांनी या बैठकीमध्ये मंगळवेढा तालुक्यासाठी म्हैसाळ उपसा सिंचन पाणी अनुषंगाने केलेल्या विविध मागण्यांची मंत्री महोदय यांनी तात्काळ दखल घेऊन यावर योग्य ती कार्यवाही लवकरात लवकर करावी असे अधिकारी व पदाधिकाऱ्यांना आदेशित केले आहे.

या बैठकीसाठी खा.संजयकाका पाटील, आ.शहाजीबापू पाटील, आ.विक्रम सावंत आ.गोपीचंद पडळकर, आ.अरुण लाड, आ.श्रीमती सुमन पाटील, माजी आमदार दिपक साळुंखे-पाटील, माजी आमदार प्रशांत परिचारक, जलसंपदा विभाग कार्यकारी अभियंता रो. रा. कोरे यांच्यासह इतर मान्यवर तसेच या योजनेतील प्रकल्प अधिकारी पदाधिकारी उपस्थित होते.